एक जिवंत अनुभव
मला खात्री आहे की, हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला अनेक पुस्तके वाचण्याचा अनुभव काही मिनिटांत मिळवू शकतो...
माझा ‘टर्न अराउंड’ अनुभव
कॉर्पोरेट - दिलीप शेवडे
माझ्या स्वत:च्या आयुष्यात घडलेली एक कॉर्पोरेट कहाणी मी आपल्याला सांगणार आहे. एखाद्या नाटकाप्रमाणे किंवा चित्रपटाप्रमाणे यामध्ये संघर्ष, आव्हान. डाव, प्रतिडाव, जय, पराजय, दु:ख, आनंद असं सगळं काही आहे. फरक इतकाच की, नाटक-सिनेमात ते पूर्णपणे काल्पनिक असतं. वास्तवातल्या व्यक्तींशी किंवा घटनांशी त्यांचं साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा असं स्पष्टीकरण आधीच दिलेलं असतं. इथं मात्र मी सांगणार आहे ते सगळं वास्तवात घडलेलं आहे. माझ्या कार्पोरेट कारकीर्दीत मी स्वत: घेतलेला हा जिवंत अनुभव आहे.
माझा ‘टर्न अराउंड’ अनुभव
या अनुभवाची सुरुवात झाली ती लिकर किंग म्हणून ओळखल्या जाणा-या विजय मल्या यांच्या भेटीपासून. काही संबंधित व्यक्तींकडून मला निरोप आले होते की, विजय मल्या त्यांच्या एका कंपनीच्या प्रमुख पदासाठी माझा विचार करू इच्छित आहेत. (कंपनीच्या नावाचा उल्लेख काही कायदेशीर कारणांमुळे करता येत नाही) माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणं मी त्या कंपनीविषयी बाहेरून माहिती काढली. कंपनीनं नुकत्याच जाहीर केलेल्या निकालांप्रमाणे कंपनीची आर्थिक स्थिती चांगली होती. एवढी खातरजमा केल्यावर मी श्री. मल्या यांना भेटायला जाण्याचा निर्णय घेतला.
बंगलोरला जेव्हा माझी विजय मल्या यांच्यासमवेत भेट झाली तेव्हा त्यांच्या ग्रुपचे काही वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. चर्चेची सुरुवात ज्याप्रकारे श्री. मल्या यांनी केली ती ऐकून मला धक्का बसला. त्यांच्या त्या कंपनीची आर्थिक स्थिती किती हलाखीची आहे, कंपनीमध्ये कसा भ्रष्टाचार बोकाळला आहे, कर्मचा-याचं मनोधैर्य कसं खचलं आहे याचं अत्यंत निराशाजनक वर्णन ते करत होते. साध्या मराठीत सांगायचं, तर कंपनी जवळ जवळ गाळात चालली आहे असा त्यांचा बोलण्याचा मतितार्थ होता.
‘‘पण तुमच्या कंपनीचं मी पाहिलेलं आर्थिक चित्र खूप वेगळं आहे. कंपनी उत्तम नफा मिळवते तर आहेच, कंपनीची उलाढालही वाढते आहे असं त्या कागदपत्रांवरून दिसतं आहे. तुम्ही मात्र त्याच्याशी विपरीत चित्र माझ्यापुढं रंगवत आहात. याचा अर्थ मी काय घ्यायचा?’’
माझ्या गोंधळलेल्या बोलण्यावर श्री. मल्या यांनी एक शैलीदार स्मित केलं. त्यांच्यामते सध्या जी व्यक्ती त्या कंपनीची प्रमुख आहे तिनं रंगवलेलं ते संपूर्णपणे खोटं चित्र होतं. कंपनीची आर्थिक हालत इतकी खराब आणि चिंताजनक होण्यालाही तीच व्यक्ती कारणीभूत होती. त्यांना मी या नोकरीसाठी फक्त ‘हो’ म्हणण्याचा अवकाश होता की, लगेच ते त्या व्यक्तीला कंपनीतून काढून टाकणार होते. इतकंच नाही तर त्या व्यक्तीवर दिवाणी आणि फौजदारी असे दोन्ही गुन्हे दाखल करण्याची त्यांची तयारी असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. या बोलण्यामुळे तर माझा गोंधळ कमी होण्याऐवजी आणखीनच वाढला.
माझ्या कार्पोरेट करिअरमधला तोवरचा आलेख सतत चढता राहिला होता. देशातल्या आणि देशाबाहेरच्या मोठ्या कंपन्यांसाठी मी यशस्वीपणे काम केलं होतं. जगातल्या चित्र-विचित्र देशांमध्ये एरवी अशक्य वाटतील अशी कामं मी करून दाखवली होती. या पार्श्र्वभूमीवर मल्यांची ऑफर स्वीकारणं म्हणजे आपण होऊन विस्तवात हात घालून भाजून घेण्यासारखं होतं. पण ते काम खूपच अवघड होतं म्हणूनच मल्या आणि त्यांच्या संबंधितांना माझी आठवण आली होती, हेही विसरता येत नव्हतं. अवघड आव्हानं स्वीकारणारा माणूस म्हणून माझ्याकडे ते पाहत होते. मलासुद्धा मनात कुठंतरी माझी ही ओळख आवडत होती. मल्यांची ऑफर मी स्वीकारली त्यामागे हेच सर्वांत प्रबळ कारण असावं असं आता मागे वळून विचार करताना वाटतं.
मी या कंपनीत जेव्हा चार्ज घेतला तेव्हा मल्या इतके चिंतित का होते हे लक्षात यायला लागलं. जसजशी मी कागदपत्रं चाळायला लागलो, फायली पाहायला लागलो तसतसा काय प्रकार झाला आहे हे माझ्या लक्षात यायला लागलं. व्हाऊचर्सची फाईल पाहताना मला लगेच जाणवलेली बाब म्हणजे कंपनीतल्या उच्च व्यवस्थापनाने प्रचंड भत्ते घेतले होते. भरपूर प्रवासखर्च लावले हाते. पण कर्मचा-यांना आठ-आठ महिने पगार दिले जात नव्हते. देणेक-याचे तगादे असलेल्या पत्रांची फाईल टम्म फुगलेली होती. बँक अकाउंटची स्थिती अंगावर काटा आणणारी होती. कंपनीला मिळालेली पंचवीस कोटी रूपयांची कॅश क्रेडीटची लिमिट कधीच वापरून संपलेली होती. नंतर काढलेला पंचवीस कोटी रुपयांचा ओव्हरड्राफ्टही वापरलेला होता. शिवाय आठ ते दहा कोटी रुपयांचा थेट तोटा दिसत होता. देणेक-यांची तीस ते पस्तीस कोटी रुपयांची थकित देणी त्याहून वेगळी. आपला अस्सल मराठी बाणा दाखवत मल्यांकडून मी हे आव्हान स्वीकारलं तर होतं, पण मी ते कसं निभावणार होतो हे मलाही कळत नव्हतं.
दिवसाच्या चोवीस तासांपैकी कोणत्याही वेळेला देणेक-यांचे फोन येत होते. तोपर्यंत आश्वासन ऐकून त्यांचा संयम संपलेला होता. त्यांच्या भावना सहाजिकच तीव्र होत्या. त्यांची संतप्त भाषा ऐकून घेणेच माझ्या हाती होतं. जरा सबुरीनं घेण्याचा सल्ला मी त्यांना देत होतो. पण त्यांच्या आवेशापुढं माझं बोलणं अगदीच केविलवाणं वाटत होतं. एक माणूस तर सतत बिहारमधून फोन करत होता. त्याच्याकडचे सगळे पैसे संपले होते. त्याच्या मुलीच्या ठरलेल्या लग्नासाठी त्याला पैसे हवे होते. आता या स्थितीत मी पैसे पाठवले नाही तर त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नव्हता. कंपनीची स्थिती पाहता आणखी काही काळ मी पैसे पाठवू शकणार नव्हतो. असहायतेचा इतका जीवघेणा अनुभव मी तोवरच्या आयुष्यात घेतलेला नव्हता. दिवसा स्वास्थ्य नाही आणि रात्री झोप नाही अशा अवस्थेत मी जगत होतो. कशामुळे माहीत नाही पण कंपनी सुस्थितीत आणण्याचा मनातला निर्धार मात्र ढळलेला नव्हता. ‘पैर में पंचधातुओंकी बेडिया थी और चढना था पहाड’ हे मुन्शी प्रेमचंदांचं वाक्य माझ्यातल्या अस्वस्थतेला तंतोतंत लागू होतं.
या सगळ्यांत भरीत भर म्हणून आणखी एक आपत्ती माझ्या स्वागतासाठी सज्ज होती. ती म्हणजे नॉन परफॅर्मिंग ऍसेट (एन.पी.ए.). मी ज्या व्यक्तीकडून चार्ज घेतला ती व्यक्ती मला हेटाळणीच्या स्वरात म्हणाली, ‘‘बाकी तुमचा उत्साह ठीक आहे, पण मि. शेवडे पण तो एन.पी.ए. तुम्ही कसा हँडल करणार आहात हे मात्र मला कळण्याच्या पलीकडचं आहे. ’’ प्रश्न गंभीर होताच, पण त्याबाबतीत मी बँकांशी समोरासमोर बसून चर्चा करण्याचा निर्णय घेतला.
याचदरम्यान आणखी एका प्रश्नावरूनही आमची बँकांशी झटापट चालू होती. एका कामाचं टेंडर भरण्यासाठी आम्हाला पाच कोटींची बँक गॅरंटी हवी होती. आमचा आधीचा ट्रॅक पाहून तो द्यायला बँका तयार नव्हत्या. जर कामाचं टेंडरच भरता आलं नाही तर काम मिळणार कसं आणि नवी कामं केली नाहीत तर ही कोंडी फुटणार कशी असा रास्त प्रश्न मी बँकांपुढे मांडला. मी त्यांना म्हटलं की, आमची अडवणूक करण्यात तुमचा अजिबात फायदा नाही. याउलट मला जर एक संधी तुम्ही द्याल तर फक्त सहा महिन्यांत मी हे चित्र बदलून दाखवतो. माझ्या या युक्तिवादामुळे बँका काहीप्रमाणात सहकार्य करायला तयार झाल्या. त्यामुळे प्रयत्नांना गती मिळायला सुरुवात झाली.
‘चॅरिटी बिगिन्स ऍट होम’च्या चालीवर मी दोन महत्त्वाच्या घोषणा कंपनीत केल्या. त्यातल्या पहिलीमुळे तर सगळेच हादरले. कंपनीतल्या शेवटच्या कर्मचा-याला पगार मिळत नाही तोवर मी स्वत: पगार घेणार नाही असं मी जाहीर केलं. सहाजिकच पुढचे सात ते आठ महिने पगाराशिवाय मला काम करावं लागलं. पूर्वी माझ्या पदावर काम करणारी व्यक्ती परदेश दौ-यावर असताना दिवसाला साडेपाचशे ते सहाशे यू.एस.डॉलर्स इतका भत्ता घेत असे. साहजिकच दुस-या फळीच्या अधिका-यांना त्याप्रमाणात भत्ते मिळत. मी स्वत:चा भत्ता तीनशे डॉलर्सपर्यंत खाली आणला. सहाजिकच सगळ्यांचे भत्ते कमी झाल्यामुळे कंपनीचा भार कमी झाला. पुढच्या दोन ते तीन वर्षांत सर्वाधिक परदेश दौरे मलाच करावे लागल्याने भत्ते कमी झाल्याची झळ अर्थातच सगळ्यात जास्त मला बसली.
या प्रकारात माझं आर्थिक नुकसान झालं. तरी कंपनीत कडक शिस्त आणण्याचा नैतिक अधिकार मला प्राप्त झाला. माझ्या परवानगीशिवाय कंपनीत एकही पैसा खर्च होता कामा नये असा दंडक मी घातला. त्यासाठी रोज संध्याकाळी एक तास मी फायनान्स कन्ट्रोलर बरोबर बसायला सुरुवात केली. त्या दिवशी आमच्याकडे किती पैसे आहेत आणि त्यांचं वाटप कसं व्हावं हे मी फार काटकसरीनं ठरवत असे. माझा नेहमीचा अनुभव असा आहे की, लाखो डॉलर्सची बचत करण्याच्या मागं लागण्यापेक्षा रुपये-आणे-पैसे वाचण्याचा प्रयत्न करणं अधिक महत्त्वाचं असतं. कारण बचतीची सुरुवात खालून वर होत असते हे लक्षात घेतलं पाहिजे.
कोणत्याही कंपनीमध्ये मार्केटिंगचे लोक किती विचारपूर्वक काम आणतात यावर ती कंपनी जोरात चालणार की यथातथा प्रगती करणार हे ठरत असतं. या कंपनीनं एक कोटी, दोन कोटी, पाच कोटी, सात कोटी अशा रकमांची बरीच कामं मिळवलेली होती. यातल्या प्रत्येक साईटवर प्रोजेक्ट मॅनेजर, सुपरवायझर, अकाऊंटंट, कारकून अशी मोठी पलटण लागायची. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च झपकन वाढायचा. कधी कधी मिळालेला नफा त्यातच जायचा. यावर उपाय म्हणून मी मोठी कामं मिळवण्याचा सपाटा लावला.
मी जामनगरला जाऊन थेट रिलायन्समध्ये धडकलो, त्यांना म्हटलं, आमच्या कंपनीची गरज अशी आहे की, पाच-दहा कोटींची कामं आम्हांला परवडत नाहीत. पण जर मोठी कामं दिलीत तर अत्यंत स्पर्धात्मक दरामध्ये, ठरलेल्या वेळेमध्ये उत्कृष्ट दर्जाचं काम करण्याची हमी आम्ही देऊ शकतो. त्यापूर्वी परदेशात अनेक मोठी आंतरराष्ट्रीय डील्स मी यशस्वी केली होती. माझा तो अनुभव या वाटाघाटींच्यावेळी कामाला आला. त्यांनी आम्हाला दीडशे कोटी रुपयांचं काम एकाच जागेवर दिलं.
अशी कामं मिळवणं जसं कठीण असतं तसंच ते निभावणंही कठीण असतं. एका अत्यंत थरारक प्रसंगाला याकाळात मला सामोरं जावं लागलं. मी काही कारणांनी लंडनला होतो. गुजरातमध्ये महाभयानक चक्रीवादळ होऊन रिलायन्सच्या प्रकल्पाची वाताहात झाली. हे समजल्यानंतर पुढच्या चोवीस तासांत मी जामनगरला पोहोचलो. नेमकं किती आणि कशाप्रकारचं नुकसान झालं आहे याचा अंदाज घेतला. अवघ्या चार दिवसांत पुण्यात अडीच हजार लोकांची जुळवाजुळव केली. दिवसाचे चोवीस तास आणि आठवड्याचे सातही दिवस माझी माणसं काम करत होती. जागतिक विक्रम ठरेल इतक्या कमी वेळात तो प्रकल्प आम्ही पूर्ववत केला. मुख्य म्हणजे आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ होता याची रिलायन्सला खात्री पटली. एखाद्या कंपनीचा टर्न अराउंड करायचा असेल तर काय काय करावं लागतं हे या निमित्तानं लक्षात घेण्यासारखं आहे.
मोठी कामं मिळवण्याची मार्केटिंगची मोहीम मी स्वत:च चालवत होतो, त्यामुळे त्याला यश येत होतं. रिलायन्सप्रमाणेच आम्ही दाभोळ पॉवर कंपनीकडूनही मोठी कामं मिळवली आणि ठरलेल्या वेळेत केली. माझ्या परदेशातल्या संपर्काचा वापर करत दुबई आणि इतर आखाती देशांमधून ही कामं मिळवू शकलो. ही सगळी कामं मोठ्या रकमेची असल्यामुळं कंपनीचा प्रशासकीय खर्च कमी होत होता, नफा वाढत होता, देणेक-यांचे पैसे हप्त्या-हप्त्याने दिले जात असल्यामुळे त्यांचे तगादे आता सौम्य झाले होते. मला सांगायला अभिमान वाटतो की, जी बँक आम्हाला पाच कोटींची गॅरंटी देत नव्हती त्या बँकेने दोन वर्षांत एकशे साठ कोटी रुपयांचा पफार्मन्स बॉंड आम्हांला मंजूर केला. माझ्या कामाची पद्धत आणि वेग कर्मचा-यांना जाणवत होता. कंपनीतली तरुण पोरं तर अतिशय उत्साहानं या मोहिमेत सहभागी झाली होती. प्रश्न होता तो अर्थातच जुन्या खोडांचा.
कंपनीतल्या अनेक जुन्या उच्चपदस्थांचं काय करावं हे मला कळत नव्हतं. एकेकाळी या लोकांनी कंपनीसाठी चांगलं काम केलं असणार. पण आता त्यांचा भार पेलणं अवघड होत होतं. यामध्ये कंपनीतल्या बहुतेक खात्यामधली वरिष्ठ पदावरची मंडळी होती. माझं इतक्या वर्षांच्या अनुभवातून तयार झालेलं असं मत आहे की, जी कार्यक्षम माणसं असतात ती एकदा कंपनीत प्रूव्ह झाली की अप्रामाणिक बनायला सुरुवात होते. एक तर त्यांचा स्वत:विषयी अहंगंड तयार होतो. आपण कोणी तरी इतरांपेक्षा वेगळे आहोत मानणारी ही माणसं प्रत्यक्ष काम कमी करताना दिसतात. ब-याचदा बुद्धीच्या आणि अनुभवांच्या जोरावर आपल्या आळशीपणावर पांघरूण घालतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये जेवढ्या क्षमता असतात त्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत नाही. त्यामुळे कार्यक्षमता, प्रामाणिकपणा आणि यशस्विता या तिन्ही गोष्टी सहसा एकाच व्यक्तीमध्ये आढळत नाहीत. या कंपनीतही तोच प्रकार झालेला होता. त्यामुळे थोडासा रोष पत्करूनही मी ज्येष्ठांना बाजूला करून त्या त्या विभागातल्या तरुणांना बढती दिली. त्यांच्यावर जबाबदा-या सेापवल्या. अपेक्षेप्रमाणं अतिशय उत्तम कामगिरी ही तरूण पिढी करून दाखवू लागली.
या अनुभवात प्रखरपणे समोर आलेलं आणखी एक सत्य यानिमित्तानं मला सर्वांसमोर मांडायचं आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात बहुतेकदा लोक पी.आर.ऍक्टिविटीज, इमेज बिल्डिंग, एच.आर.प्रॅक्टिसेस, मार्केटींगची टार्गेटस्, वार्षिक उलाढाली या बाबींमध्ये पूर्णपणे रमून जाताना दिसतात. या सगळ्या बाबी महत्त्वाच्या आहेत यात शंकाच नाही. पण सर्वात महत्त्वाचा असतो तो कॅश फ्लो. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर रोजच्या खर्चासाठी हातात पैसे असणं. नाहीतर करोडो रुपयांची उलाढाल करत राहायची आणि काही हजार रूपये खर्चासाठी हातात नसायचे हे काही कामाचं नाही. कॅश फ्लो हा कंपनीचा जीवनरस असतो. तो असेल तर सगळ्या गोष्टी छानच असतात. पण तो नसेल तर अगदी कशालाच अर्थ उरत नाही. हे वास्तव लक्षात घेऊन मी फायनान्सचं नियोजन अशाप्रकारे केलं की दैनंदिन खर्चांसाठी आणि पगारांसाठी अकाऊंटमध्ये पैसे नाहीत अशी स्थिती कधी येता कामा नये.
माझ्या आधीच्या कारभा-यांनी करून ठेवलेलं आणखी एक पाप मला एकूणच महागात पडलं. हा प्रकार नेमका कळण्यासाठी थोडक्यात पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे. सहसा मोठ्या टेंडर्समध्ये खूप गळेकापू स्पर्धा असते. शेवटच्या दोन टेंडर्समध्ये तर अगदी काही पैशांचाही फरक असू शकतो. त्यामुळे ज्या कंपनीला टेंडर मिळतं तिला या मूळ कामात फारसा नफा होण्याची शक्यताच नसते. त्यामुळे मूळ कामाच्या बरोबरीनं केल्या जाणा-या पूरक कामांमध्ये खरा नफा मिळत असतो. त्याला क्लेम्स असं म्हणतात. माझ्या आधीच्या लोकांनी अनेक प्रकल्पात असे क्लेम धरले होते. त्यांच्याकडून मिळणारा संभाव्य नफा जणू आता मिळालाच आहे असं गृहित धरून कंपनीचं वार्षिक उत्पन्न वाढवलेलं दाखवलं. यातून सहाजिकच कंपनीचं खोटं आर्थिक चित्र निर्माण झालं होतं. असे खोटे आणि फसवे प्रॉफिटस् बुक्समधून काढून टाकणं मला भाग होतं. त्यातून अनेक नव्या अडचणी समोर उभ्या राहिल्या.
येणेकरी आणि देणेकरी यांचा समतोल राखणं ही कोणत्याही व्यवसायात न संपणारी प्रकिया असते. जुन्या वसुलीसाठी मी स्वत: लोकांकडे जायला सुरुवात केली. कमीत कमी दिवसांमध्ये त्यांच्याकडे अडकलेले पैसे मोकळे करून घेणं एवढीच खूणगाठ मनाशी बांधून मी बोलत होतो. काहीप्रमाणात त्यामध्येही यश येत चाललं होतं. ते पैसे खूपच महत्त्वाचे होते. कारण ते हक्काचे होते. कोणाला परत देण्याचे नव्हते. त्याचप्रमाणे आठवड्यातून दोनदा देणेक-यांना भेटायला सुरुवात केली. थोडावेळ मागून घेतला. जेवढे पैसे देणं शक्य होतं तेवढंच आश्वासन दिलं. पण प्रत्येक तारीख पाळली. त्यातून विश्वास निर्माण झाला.
कंपनीचा प्रमुख म्हणून मला कंपनीच्या समाजातल्या प्रतिमेचाही विचार करणं भाग होतं. कंपनीची बदनामी करणा-या काही बातम्या पूर्वी येऊन गेल्या होत्या. आता पत्रकारांना सांगण्या-या अनेक सकारात्मक घटना माझ्याकडं घडत होत्या. सर्व माध्यमांनी चांगलं सहकार्य दिलं. कंपनीचा नावलौकिक पुन्हा पूर्वपदावर येतो आहे असा स्पष्ट संदेश समाजात पसरू लागला. नवीन कामं मिळवताना त्यांचाही उपयोग होऊ लागला. अर्थात ते भारतापुरतं होतं. परदेशातली कामं मिळवताना उपयोग झाला तो माझ्या जगभरातल्या संपर्कांचा. मी जशी आखाती देशांमधून कामं आणली तशीच युरोपातूनही आणली. भारतातल्या कंपन्यांचे तोटे भरून काढण्यासाठी परदेशातून कामं मिळवणं हा उत्तम पर्याय आहे असं माझ्या लक्षात आलं.
मी जबाबदारी स्वीकारल्यापासून तीन वर्षांच्या काळात नकारघंटांचं रूपांतर होकारघंटांमध्ये व्हायला सुरुवात झाली. कंपनी अगदी पळायला लागली नसली तरी उठून स्वत:च्या पायावर उभी होती. मल्यांनी शेवटच्या घटका मोजणारी कंपनी माझ्या हाती सोपवली होती. तिला मी इथंपर्यंत आणू शकलो याचं समाधान होतंच. हा काळ जसा शिकण्याचा होता तसा रोज नव्या वेदनांचाही होता. दिवसाचे सोळा-अठरा तास काम करून मी अक्षरश: रगडून निघत होतो. पण तो त्रास काहीच नाही असं वाटण्याइतका मन:स्ताप वाट्याला येत होता. दु:ख सोसण्याची आपली क्षमता वाढली आहे असा शोध याकाळात मला लागला.
मी जबाबदारी स्वीकारल्यापासून तीन वर्षांच्या काळात नकारघंटांचं रूपांतर होकारघंटांमध्ये व्हायला सुरुवात झाली. कंपनी अगदी पळायला लागली नसली तरी उठून स्वत:च्या पायावर उभी होती. मल्यांनी शेवटच्या घटका मोजणारी कंपनी माझ्या हाती सोपवली होती. तिला मी इथंपर्यंत आणू शकलो याचं समाधान होतंच. हा काळ जसा शिकण्याचा होता तसा रोज नव्या वेदनांचाही होता. दिवसाचे सोळा-अठरा तास काम करून मी अक्षरश: रगडून निघत होतो. पण तो त्रास काहीच नाही असं वाटण्याइतका मन:स्ताप वाट्याला येत होता. दु:ख सोसण्याची आपली क्षमता वाढली आहे असा शोध याकाळात मला लागला.
टर्नअराउंडच्या या संपूर्ण प्रयोगात सर्वाधिक कसोटी लागली ती माझ्या पेशन्सची. जर माझ्याकडं पुरेसा पेशन्स नसता, तर गाडी इथंवर पोहोचू शकली असती असं मला वाटत नाही. आपण कितीही झपाट्यानं काम केलं तरी प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी काही एक वेळ हा लागतोच. आपल्याला काम लवकर होण्यासाठी जशी घाई करावी लागते, तसं त्याच्या परिणामांची वाट पाहात थांबण्याची तयारी असावी लागते. एखाद्या अवघड कामाला जेव्हा आपण हात घालतो तेव्हा मन:स्तापाचे क्षण आपल्या वाट्याला येणार याची जाणीव आधीच असावी लागते. मी आणखी किती सोसू असा विचार करून चालत नाही. ‘सोसण्याला अंत नाही, सोसणे चालूच राही’ अशी गाठ मनाशी बांधून दररोज नवे त्रास सोसावे लागतात. त्या अर्थानं सोसण्याचाही एक पेशन्स असावा लागतो.
कंपनीची परिस्थिती इतक्या कमी काळात इतक्या मोठ्या प्रमाणात मी बदलू शकेन अशी बहुधा विजय मल्यांची अपेक्षा नसावी. बंगलोरला त्यांच्यापर्यंत अनेक चांगल्या बातम्या पोहोचत होत्या. माझ्याशी प्रत्यक्ष बोलताना कामाविषयीचं समाधान त्यांनी मोकळेपणानं व्यक्त केलं. पुढच्या काळात मीच त्या कंपनीची धुरा वाहावी अशी त्यांची साहजिकच अपेक्षा होती. पण माझ्याबाजूनं ते घडणं नव्हतं. काही कौटुंबिक प्रश्नांमुळे ती कंपनी सोडण्यावाचून माझ्यापुढं दुसरा पर्याय नव्हता. पण ती कंपनी सोडताना माझ्या मनात मी केलेल्या कामाविषयी समाधानाची आणि श्री. मल्या यांनी मला दिलेल्या एका अनुभवाविषयी कृतज्ञतेची भावना होती.
दिलीप शेवडे.
प्रतिक्रिया नक्की कळवा..
असे लेख मिळवण्यासाठी LIKE करा
https://shabasguruji.blogspot.com/Share
No comments:
Post a Comment
Thank You..!
For your valuable message...